सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याच्या हालचालींना वेग ; १० ते १२ दिवसांत माण नदीत टेंभूचे पाणी दाखल होणार
कोरडा नदीसह नीरा उजवा कालवा आणि राजेवाडीच्या पाण्यासाठीही दिपकआबांचा पाठपुरावा सुरूच ; पाणीप्रश्न गंभीर पण त्यासाठी दिपकआबा खंबीर

सांगोला ; विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
टेंभू योजनेचे पाणी सांगोला तालुक्यातील माणगंगा नदीत सोडण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना सूचना केल्या आहेत. यावर कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी येत्या १० ते १२ दिवसात टेंभू योजनेचे पाणी लवकरात लवकर मानगंगा नदीत सोडू असे आश्वासन दिल्याने सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याच्या हालचालींना शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर चांगलाच वेग आला आहे.
निम्मा पावसाळा उलटला तरी सांगोला तालुक्यात वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि पशुधन प्रचंड अडचणीत आले आहे. तालुक्यातील शेतकरी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन टेंभू योजनेचे पाणी माण नदीत म्हैसाळ योजनेचे पाणी कोरडा नदीत त्याचबरोबर नीरा उजवा कालव्यातून फाटा क्र ४ आणि ५ ला पाणी सोडावे तसेच राजेवाडी तलाव भरून याखाली असणाऱ्या सांगोला तालुक्यातील लाभार्थी गावांना पाणी सोडावे म्हणून दिपकआबांनी चांगलीच कंबर कसली आहे.
यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी पशुपालक व सर्वसामान्य नागरिक प्रचंड जल संकटाला तोंड देत आहे तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृष्णा, कोयना, पंचगंगा, नीरा व भीमा नदीतील पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी टेंभू योजनेद्वारे मानगंगा नदीत म्हैसाळ योजनेद्वारे कोरडा नदीत पाणी निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला देण्यात यावे तसेच राजेवाडी तलाव भरून याखाली असणाऱ्या सांगोला तालुक्यातील गावांना पाणी मिळावे यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी चांगलाच पुढाकार घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे ग्रामीण विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लेखी निवेदन दिले होते. त्याचबरोबर सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तहसील कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागणीची निवेदन प्रशासनालाही सादर केले होते.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आणि टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार कार्यकारी अभियंता डवरी यांनी येत्या १० ते १२ दिवसांत टेंभू उपसा सिंचन योजनेतून मानगंगा नदीत पाणी सोडण्यात येईल असे स्पष्ट केले आहे त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी पशुपालक आणि सामान्य नागरिकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.
चौकट
पाणीप्रश्न गंभीर पण, दिपकआबांचा पाठपुरावा खंबीर..!
सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर असला तरीही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा पाठपुरावाही तितकाच खंबीरपणे सुरू असल्याने तालुक्याला पाणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.



