घेरडीत जनसागराचा महापूर! “मी जिथे जातो, तिथे विजय ठरलेलाच”; उत्तमराव जानकरांचा विरोधकांवर कडाडून प्रहार

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी हे लढाऊ नेतृत्व मैदानात उतरले आहे. “ज्या सरकारने निवडणुका रोखून धरल्या, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ज्या ‘डोमकावळ्यांनी’ तिकीट नाकारून फसवणूक केली, त्यांना आता जनताच त्यांची जागा दाखवून देईल,” अशा शब्दांत माळशिरसचे आमदार उत्तमरावजी जानकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार शुभांगी अनिल मोठे (जिल्हा परिषद गट), श्रीनिवास मधुकर करे (घेरडी पंचायत समिती गण) आणि वर्षा सुरेश गवंड (सोनंद गण) यांच्या प्रचारार्थ घेरडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.सभेला संबोधित करताना जानकर यांचा आत्मविश्वास दांडगा दिसला. त्यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत विजयाची खात्री दिली”मी जेव्हा बाबासाहेब देशमुखांच्या प्रचाराला आलो, तेव्हा ते विजयी झाले. नगरपालिकेच्या वेळी ‘बाण’ चिन्हाचा प्रचार केला, तेव्हा बाण विजयी झाला. आता अनिल दादा, तुम्ही काळजी करू नका. मी ज्या ठिकाणी पाऊल ठेवतो, तिथे विजय निश्चित असतो!” त्यांच्या या विधानाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून सभास्थळ टाळ्यांच्या कडकडाटाने आणि घोषणाबाजीने दणाणून गेले होते. घेरडी आणि परिसरातील नागरिकांनी सभेला मोठी उपस्थिती दर्शवली होती, ज्यामुळे सभेचे रूपांतर एका मोठ्या जनसमुदायात झाले होते. लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. केवळ मोठ्या नेत्यांची नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी ‘तुतारी’ चिन्हाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
या सभेमुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, शरद पवार गटाच्या उमेदवारांचे पारडे जड झाल्याची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे.



