खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

सांगोला/विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
राज्य शासनाच्या ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेत मंगळवेढा पोलिस ठाण्याने सोलापूर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
गेल्या दहा वर्षांत (२०१६ ते ३० मे २०२६ या काळात) विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या तब्बल १२३ व्यक्तींचा यशस्वी शोध लावण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीमुळे अनेक वर्षांपासून ताटातूट झालेल्या शेकडो कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत.
महिला पोलिस उपनिरीक्षक डॉ. आरती कणिरे यांनी विशेष पुढाकार घेत या मोहिमेत ७३ महिला व ५० पुरुष अशा एकूण १२३ बेपत्ता नागरिकांचा शोध लावला.
सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
परराज्यातून आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर शोध
बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, डॉ. आरती कणिरे आणि त्यांच्या पथकाने सीडीआर (CDR), लोकेशन ट्रॅकिंग आणि आधुनिक तांत्रिक तपासाचा कौशल्याने वापर केला.
या पथकाने थेट कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, लातूर, यवतमाळ आणि परभणी अशा विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन अत्यंत चिकाटीने शोध घेतला. या मोहिमेत पोलिस हवालदार श्रीराम ताटे व पोलिस अंमलदार राहुल सोनकर यांनीही मोलाचे योगदान दिले.
’ऑपरेशन शोध’ एका नजरेत…
एकूण शोधलेल्या व्यक्ती: १२३
महिला: ७३ | पुरुष: ५०
शोधकार्याचा कालावधी: २०१६ ते ३० मे २०२६
प्रमुख कार्यक्षेत्र: कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र तपासाची प्रमुख साधने: सीडीआर, लोकेशन ट्रॅकिंग आणि हायटेक तांत्रिक तपास
पोलीस अधिकारी डॉ. आरती कणिरे यांचा ‘सिक्सर’
मंगळवेढा पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून डॉ. आरती कणिरे यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘ऑपरेशन शोध’पूर्वीही त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे तपास करत ३५ बेपत्ता मुलींचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि धडाकेबाज कामगिरीमुळे मंगळवेढा पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ही केवळ ड्युटी नव्हे, सामाजिक बांधिलकी
”बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे ही केवळ आमची कायदेशीर जबाबदारी नाही, तर ती एक मोठी सामाजिक बांधिलकी आहे. आधुनिक तांत्रिक तपास, टीमवर्क आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आम्ही १२३ कुटुंबांना त्यांचा हरवलेला आनंद परत मिळवून देऊ शकलो.”
— दत्तात्रय बोरीगिड्डे (पोलिस निरीक्षक, मंगळवेढा)



